भाग -३२.
सोपानांनी १५ वा अध्याय लिहायला घेतला.इथ श्रीकृष्ण एका वेगळ्याच वृक्षाचं उदाहरण देऊन ज्ञानाचं महत्व सांगतो त्याचं अनुवाद त्यांनी केलं. “उर्ध्व मूळ आहे ज्या वृक्षाचे ।
अधःशाखा विस्तार ज्याचे ।
सत्य छेद वेदरुप तयाचे ।
परी त्याते जाणे तो चि ज्ञानी ।।
श्रीकृष्णाची भव्य प्रतिभा समजावुन सांगण्याची कला आणि मानव कल्याणार्थ केलेला उपदेश या त्रिदर्शनाने सोपान भारावुन गेले.
सोळावा अध्याय मात्र सोपानांना वेगळा वाटला.यांत मानवाचे गुण आणि अवगुण दोन्हीही सांगीतले.गुण देव सापेक्ष,तर अवगुण दानव सापेक्ष अशी मिमांसा केली.अवगुणांचं मुळ,मानवाचं अकल्याण,मानव्याचा नाश करणारं,देव बनण्याऐवजी दानव,असूर बनवणारे अवगुणाचं वर्णन श्रीकृष्ण करतो.खरचं! श्रीकृष्णांनी मानव कल्याणाचा किती बारकाईने,साक्षेपाने विचार केला होता. आणि हे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं भाग्य आपल्याला लाभलं हे पूर्वसंचिताचं फळच आहे.
याच आनंदात त्यांनी सतरावा अध्याय हाती घेतला नी ते थक्क झाले. या अध्ययात भगवान श्रीकृष्णांनी सात्विक,राजसी,तामसी व्यक्तीचे गुण, लक्षण,विचार,सवयी,आचार याचं समृध्द आणि समर्पक असं विवेचन केले होते.
श्रीकृष्णांनी सत्व,रज,तम, या गुणांची केलली मिमांसा लक्षणीय होती.या अध्यायाचा शेवट सोपानांनी असा केला..
“श्रध्दा नसता होम दान ।
तप आणि कर्म कारण ।
असभ्य शब्द जाण ।
इहलोकी परलोकी नव्हे बरवे ।।
सतरावा अध्याय संपला.अवघडलेलं अंग मोकळं केलं.आपल्या हातुन एवढ सारं लिहुन झालं याचं त्यांना आश्चर्य वाटले. जेवन झालं आणि थकलेला जीव आणि मन कधी झोपी गेलं कळलच नाही.
सकाळी लवकर उठुन नित्यकर्मे आटोपली.स्नान झाल्यावर आईच्या चरणमुद्रेची पुजा केली आणि लिखाणाचं साहित्य घेऊन बसले.आज शेवटचा १८ वा अध्याय लिहुन संकल्प पुर्णत्वास, सिध्दीस न्यायचा….श्रीकृष्णाला मनोमन भक्तीभावाने नमन करुन सुरुवात केली. सर्वसामान्य माणसाच्या मनांत नेहमी सतत उद्भवलेला प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णा ला विचारला,त्या प्रश्नाचे सोपानांनी केलेला अनुवाद असा…
“अजुन म्हणे जी नारायणा ।
मी इच्छितो जी तत्वलक्षणा ।
त्याग आणि सन्यास कवणा ।
हे वेगळे करुन सांगावे मज ।।
त्याग आणि सन्यास यातला भेद कोणता? या अर्जुनाच्या प्रश्नाला श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तराचे सोपानांनी चपलख शब्दात केलेला अनुवाद…
” देव म्हणे अर्जुना परीवेसी ।
जो कामनेसहित टाकी कर्मासी ।
तया म्हणती सन्यासी ।
योगीराज महानुभव ।।
श्रीकृष्णाने ज्ञान,ज्ञाता,कर्म,कर्ता याचं मानवी जीवनातलं महत्व उलगडुन सांगीतलं ते सोपानांनी नागरी भाषेत लिहिले…” ज्ञान ज्ञय आणि ज्ञाता ।
कर्म कारण आणी कर्ता ।
ध्येय कर्म आणि कर्ता ।
हा संग्रह कर्माचा ।
ज्ञान कर्म आणि कर्ता ।
हे वेगाळले भेद गुणावे देखा ।।
तेथे त्रिगुणाचि असे सांख्या ।
तेथे बोलिजे ते ऐका ।।
श्रीकृष्णाने अर्जुनाला सत्य-असत्य
कर्म-अकर्म,धर्म-अधर्म,सत्व-रज-तम, पाप-पुण्य,काम-क्रोध-लोभ अशा अनेक संदर्भात विस्तारानं सांगुन अर्जुनाचा संभ्रम दूर केला.गीतार्थ संपला.संपूर्ण लिहुन झालं होतंआतां याच्या संपूर्ण पठणाचं फळ सोपानांनी लिहायला घेतला.
“तेणे किरिटसी बोध जाला ।
परब्रम्ही मिळणी मिळाला ।
आणि सकलही लोका मार्ग सापडला ।
भवसागर तरावया ।” आणि शेवटी लिहलं…
” शुध्दाशुध्द तरी कोणी ।
करावी गीतेची घोकणी ।
तेणे संतोषे चक्रपाणी ।
कर्मबंधने तोडील ।।” सोपानांनी शेवट केला.लेखणी खाली ठेवली.भगवद् गीतेवर माथा टेकला.कांही चुकलं असेल तर कृष्णाला माफी मागीतली.ईश्वराचे आभार,संकल्पाची पुर्तता झाल्याचं समाधान,कार्य घडल्याची सार्थकता, निवृत्तीदादा,ज्ञानदादा,मुक्ताईस लिखान दाखवण्याची उत्सुकता,आतुरता अशा अनेक भावनांची आवर्तने सोपानांच्या मनांत उठली होती.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.
[…] सोपानदेव चरित्र ३१संत सोपानदेव चरित्र ३२संत सोपानदेव चरित्र ३३ संत सोपानदेव […]
[…] सोपानदेव चरित्र ३१संत सोपानदेव चरित्र ३२संत सोपानदेव चरित्र ३३ संत सोपानदेव […]