भाग – २९.
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संग्ङोsस्त्वकर्मणि
फळाची अपेक्षा न करतां कर्म करीत राहणे हेच सामान्य माणसाचे जीवितकार्य आहे. तिसरा अध्याय कर्मयोगाचा! सोपानांना अतिशय आनंद झाला.कारण भगवंतांनी सांगीतलेली कर्मयोगाची सारी लक्षणे ज्ञानदादात आहेत.सोपानांनी लिहिले…” लोकांमाजी द्वीधा निष्ठता ।
यापूर्वी सांगितल्या भारता।सांख्यमति ज्ञान ज्ञाता।योगियासी कर्मयोग बोलिजे।।
आतां लिहितांना त्यांना मोठा उत्साह वाटत होता,मनाशी संवाद साधत होता.
सोपानांनी चौथा अध्याय लिहायला घेतला.ज्ञानकर्म सन्यासयोग! सोपान भगवंताच्या वचनाला शब्दबध्द करुं लागले नागर मराठीमध्ये.जेव्हा सर्व सामान्यांना भगवंतांनी दिलेलं हे अभि वचने समजतील,उमजतील तेव्हाच जगातील पवित्र शक्तीवर विश्वास बसेल. नवीन दृष्टी,नवे ज्ञान मिळेल.सोपानांनी नागर मराठीत लिहिले…
तरी ज्ञानासारखे पवित्र ।
आणि नाही गा सर्वत्र ।
त्या ज्ञानासि याग करिताही निरंतर ।
ज्ञाने करुं ब्रम्ह पाविजे ।।
मानवी कल्याणाची किती सखोल मिमांसा केली होती.खाणंपिणं आटोपुन, सोपान पांचवा अध्याय लिहायला बसले.
सामान्य मानवाच्या भूमिकेतुन अर्जुन आणि गुरुच्या भूमिकेत प्रत्यक्ष श्रीकृष्ण, ही युती मानवकल्याणासाठी किती उपयुक्त ठरली हे सोपानांच्या लक्षात आलं.कर्म आणि सन्यास या दोहोंची मनोहर सांगड घालुन सर्व सामान्यांना रुचेल,पचेल असं तत्वचिंतन सांगुन पांचवा अध्याय संपवला.
शिजवलेली खिचडी खात असतांना त्यांच्या लक्षात आलं की,ते इथे आल्या पासुन रोज गाईच्या हंबरण्याचा आवाज येतोय,आताही आला.आईने सांभाळले ली गंगा गाय तर नसेल ना?त्यांनी हंबरण्याच्या दिशेला तोंड करुन गंगाsss गंगाss अशी मोठ्याने आरोळी दिली आणि झाडंझुडपं तुडवत गाय पुढ्यांत येऊन उभी राहिली.तीने त्यांना हुंगले आणि ओळख पटली.हलकेच हंबरुन त्यांना प्रतिसाद देऊं लागली.सोपान तिच्या माथ्यावरुन,पाठीवरुन प्रेमाने हात फिरवत राहिले.उरलेली खिचडी तीला खाऊ घातली.गोठ्यात बसुन रवंथ करुं लागली.सोपान पुन्हा लिहायला बसले. सहाव्या अध्यायाला सुरुवात झाली.
अनाः श्रितः कर्मफले कार्य कर्म करोतियः
न सन्यासीच योगीच न निरग्निर्न चाक्रियः
सोपानांना वाटले हा श्र्लोक भगवंतांनी आपल्यासाठीच लिहिला आहे.
“जो कर्माच फळ नुपेक्षित कर्म करी ।
तया म्हणती सन्यासी अवधारी।
तोचि सान्हिक कर्म करी।कर्म त्यागी तो नव्हे।। सहावा अध्याय संपला आणि सोपानाचा उत्साह दुनावला.
सातव्या अध्यायाला सुरुवात केली. भंगवंत चराचरात व्यापुन राहिलेल्या अस्तित्वाबद्दल सांगीतले.ज्ञानदादानं सांगीतलेलं ईश्वर चराचरात भरुन राहिला हे तत्व भगवंतांनी अधिक व्यापक,विसृत करुन सांगीतलय ईश्वराचं सर्वव्यापकत्व बघुन सोपान स्तिमित झाले.दिवस मावळला.आज खिचडी जरा जास्तच लावली.अर्धी खिचडी गाईला खाऊं घातली नंतर आपण खाल्ली.डोक्यात आठव्या अध्यायाचं विचारमंथन करीतच झोपी गेली.
दुसर्या दिवशी भल्या पहाटे उठुन गंगा गाईचा गोठा स्वच्छ झाडुन काढला. तिच्या नितळ डोळ्यात प्रेम,वात्सल्य, कृतज्ञत्वाचं प्रतिक म्हणुनच काय सोपाना च्या हाताचा स्पर्श होताच तिच्या आचळा तुन दुधाच्या धारा ओघळुं लागल्या. ताज्या गोरसानं त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या.आठवा अध्याय लिहायला बसले. सोपानांना आतां अर्जुनाची भूमिका आवडायला लागली.एखाद्या हुशार पण आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा तो श्रीकृष्णाला प्रश्न विचारी व श्रीकृष्ण सर्व सामान्यांना मार्गदर्शक होईल असं त्याचे समाधान करीत.सोपान लिहितात…
अर्जुन म्हणे गा पुरुषोत्तमा ।
कैसा निवाड अध्यात्म आणि कर्मब्रम्ह्या ।
आधिभूत आधी दैवत आम्हा।निवडुनी सांगा ।।श्रीकृष्णाचे उत्तर म्हणजे अध्यात्म आणि कर्म यांची विलक्षण सांगड होती.सोपानांनी नागर मराठीत लिहिले…
“वेद यज्ञ तन आणि दान।
त्याचे जे बोलिले आहे पुण्य।
जया असे शुक्ल कृष्ण गतीचे ज्ञान ।
ते पुण्य पावन परमगती पावे ।।”
आणि आठवा अध्याय संपला,नववा अध्याय लिहायला घेतला.इथही भगवंतानं आपलं सर्वसमावेशक अस्तित्व अर्जुनाला दाखवलं.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

[…] चरित्र २७संत सोपानदेव चरित्र २८संत सोपानदेव चरित्र २९संत सोपानदेव चरित्र […]
[…] चरित्र २७संत सोपानदेव चरित्र २८संत सोपानदेव चरित्र २९संत सोपानदेव चरित्र […]