ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.483
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८३
वासनेचे बीज भजोंनी टाकिलें । मानसासी केलें देशधडी ॥१॥ संसाराशी आगी लाविली स्वकरी । अहंतेशी दूरी दवडिलें ॥२॥ काम क्रोध लोभ मोह दंभ मद । केला याचा छेद ज्ञानशस्त्रे ॥३॥ विवेक वैराग्य बोध क्षमा शांति । राखिली संपत्ति दैविकीजे ॥४॥ राहे ज्ञानेश्वर एकचि एकट । ब्रह्मरस घोट घोटूनियां ॥५॥
अर्थ:-
आम्ही वासनेचे बीज जे अज्ञान हे भाजून टाकल्यामुळे आता संकल्प विकल्प करणाऱ्या आमच्या मनाला देशोधडीला लावले. आम्ही संसारास ज्ञानाग्नी लावून दिला व अहंकाराला दुर घालवून दिले. काम, क्रोध, लोभ मोह मद मत्सर यांचा ज्ञानरूपी शस्त्राने नाश करून टाकला. मोक्षोपयोगी असणारे विवेक, वैराग्य क्षमा शांती हे देवी संपत्तिचे गुण आम्ही आमच्या जवळ ठेवले.आम्ही ब्रह्मरसाचा भोग घेऊन एकरूप झालो.आता आम्हाला द्वैताची प्रतीती उरली नाही असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.