ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.618
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१८
अमित सूर्य प्रकाशले तेज उदयो जहाले । ज्ञानज्योति फांकले दुणावोनी वो माय ॥१॥ दामोदर नामें मना बांधिले दावें । निरंजन म्हणावें आपणा वो माय ॥२॥ गुणचि नाही त्यासी काय लाऊं गुण । अतीत निरंजन देखिला वो माय ॥३॥ डोळा जरी पाहों तरी वो डोळियासी अरूवारू । सेऊं म्हणों तरी पारू न कळे खेवावो माय ॥४॥ आतां असो हव्यासु लागला निजध्यासु । निरंजनी सौरसु करीतसे वो माय ॥५॥ आतां आहे तैसा असो माझ्या हृदयींच वसो । हा रखुमादेविवरू विठ्ठलु वो माय ॥६॥
अर्थ:-
अपरिमित सूर्य एकत्र केले असता जे तेज दिसेल त्या तेजापेक्षाही अधिक पंज ज्ञानस्वरूप परमात्मा आहे. तोच अंतःकरणामध्ये दुप्पट रूपाने प्रगट झाला. त्याच्या सगुण स्वरूपाचे नांव दामोदर असे आहे. त्या नांवाचे माझ्या मनाला जसे काही दावेच बांधले आहे. म्हणून त्या दामोदरालाच निरंजन म्हणावे. वस्तुतः त्याला गुणच नाहीत. म्हणजे तो निर्गुण आहे. मग त्याला गुण लावावेत कसे? म्हणून तो निरंजन परमात्मा मी पाहिला आहे त्याला डोळ्यांनी पहावे म्हटले तर तो निरवयव असल्यामुळे पाहता येत नाही. त्याला हातात घ्यावे असे म्हटले तर तो अपार आहे. तेव्हां अशाला आलिंगन कसे द्यावे. ते कसेही असो.पण मनाला त्याचा वेध लागला आहे खरा. त्याचा भोग अद्वितीय स्वरूपानेच घेता येईल. रखुमादेवींचे पती श्री विठ्ठल कसा आहे याचा विचार करण्यापेक्षा तो जसा असेल तसा माझ्या हृदयांमध्ये राहो म्हणजे झाले. असे माऊली सांगतात.