ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.616
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१६
पंधरयाची खाणी अनर्थ्य रत्नाचे पाणी । तें निरंजनी वनीं शोभतसे वो माय ॥१॥ गुणांची लावणी लाविली गगनीं । निरंजनीं निर्गुणी आथिले वो माय ॥२॥ पूर्णानंद सच्चिदानंद कंदु । तो निरंजनी स्वादु आळवितो माय ॥३॥ लक्ष कोटी एकला अनंतगुणी जाहला । तो अंगें अंगवला निजस्वरूपी वो माय ॥४॥ ब्रह्मरसें भरला दाही दिशा व्यापिला । आनंदु सच्चिदानंदी वोसंडला वो माय ॥५॥ ऐसा सुखसंवादु सागर भरला । रखुमादेविवरा विठ्ठला वो माय ॥६॥
अर्थ:-
जसे सोन्याच्या कोंदणात पाणीदार रत्न शोभते त्याप्रमाणे सच्चिदानंद स्वरूप, जो निर्गुण परमात्मा तो आज या वृंदावनांत शोभत आहे. ज्याप्रमाणे एखांदे वेळी आकाशांत चित्रविचित्र रंगाची शोभा दिसते.त्याप्रमाणे अनेक प्रकारचे गुण, स्वरूपाने निर्गण असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी दिसतात. तो सच्चिदानंदाचा कंदच आहे. म्हणूनच स्वतःच्या रूपाने परिपूर्ण आनंद आहे. असा तो ह्या वृंदावनामध्ये आपल्या भक्तांशी क्रीडा करीत आहे. तो एकरूप असनही कोट्यवधी रूपांनी नटला असून तो सर्व रूपे आपल्यांत पुन्हा साठवित आहे. तो सच्चिदानंद परमात्मा सर्व दिशात व्यापून त्याचा आनंद दशदिशेच्या बाहेर ओसंडत आहे. तात्पर्य असा जो जगत् व्यापून राहिलेला सुखसागर परमात्मा तेच रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल असे माऊली सांगतात.