ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.996
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९९६
काय सांगू तूतें बाई काय सांगू तुते ॥धु ॥ जात होतें यमुने पाणिया वातत भेतला सांवला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ॥१॥ तेणें माझी केली तवाली मग मी तेथूनी पलाली । पलतां पलतां घसलून पलली दोईची घागल फुतली ॥२॥ माझे घुलगे फुतले मग मी ललत बथले । तिकून आले शालंगपानी मला पोताशीं धलिलें ॥३॥ मला पोताशी धलिलें माझें समाधान केलें । निवृत्तीचे कृतं सुख हे ज्ञानदेवा लाधलें ॥४॥
अर्थ:-
एक लहान बोबडी गौळण म्हणते. बाई, तुला मी सांगू. मी यमुनेच्या पाण्यासाठी जात असतांना मला वाटेत सांवळ्या रंगाचा श्रीकृष्ण भेटला. त्याच्या डोक्यांवर मोर पिसाची टोपी असून, खांद्यावर कांबळी
होती. त्याने माझी थट्टा केल्यावर मी तेथून पळाली, पळत असतांना मी अडखळून पडल्यामुळे माझ्या डोक्यावरची घागरही फुटून गेली. माझे गुडघे फुटले. म्हणून मी तिथेच रडत बसली. मग कुठून तरी श्रीकृष्ण आले. व त्यानी मला पोटाशी धरले. श्रीकृष्णाने त्या लहान गौळणीस पोटाशी धरुन तिचे समाधान केले. त्याप्रमाणे मला सुद्धा श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपेने हे सुख लाभले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.