ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 870
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८७०
कान्हया गोवळु वारिलें न करी । दसवंती सांगे नंदा अवधारी । चौघी माया शृंगार करिती । तेथें विघ्नेश्वरू जाले मुरारी ॥१॥ आनंदें दोदिलु नाचे गदारोळे पायीं घागुरली नेवाळें । चर्म चक्षु पडले वेगळे । काढुनीयां ज्ञानचक्षु दिधलें डोळे गे बाई गे ॥२॥ गौळणी दाहा बारा मिळोनी सोळांची टोळी । एकी म्हणती यातें उभाची कवळु मा काय करील ते मौळणी गे बाईये ॥३॥ आणिकी एकी साचा बोले त्या उपरी असे त्या नागिणी । काय सांगों तिचेवीण बहुसाल ते राहिलीसे भानुतें धरूनी ॥४॥ तंव मुक्ता दोन्ही आलिसे धांवोनी म्हणती कृष्णा तूं निघ येथुनी । तीन नानावी तुम्हां पाठींच लागतील औठावे राहें धरूनी ॥५॥ गौळणी म्हणती बाळा कान्हया वेल्हाळा । सांडी या मना चाळा रे । ऐसें ऐकोन बापरखुमादेविवरें विठ्ठलें पवनु गिळितया वेळा रे ॥६॥
अर्थ:-
कांही गौळणी वेणी फणी करीत असतां त्याठिकाणी भगवान श्रीकृष्ण गेला, व खोड्या करू लागला. तेंव्हा त्या गौळणीपैकी दसवंती नांवाची गौळण नंदाला सांगते हा तुमचा कृष्ण या क्षणास अमुक करू नको म्हटले की नेमके ते करावयास लागतो. आम्ही चार पाच गौळणी आपला नित्याचा शृंगार करीत असता त्यांत विघ्न करण्याकरिता श्रीकृष्ण तेथे गेला. तो दोदिल शरीराचा श्रीकृष्ण पायांत घागऱ्या वाळे घालून मोठ्या मोठ्यांने आरोळ्या ठोकून त्यांच्यापुढे नांचू लागला. तेव्हा त्याने तो नाच बघण्याकरता आमचे चर्मचक्षुचे ज्ञान बंद करून आम्हाला ज्ञानचक्षु दिले. त्यामुळे त्यांना आनंद तर झालाच परंतु त्याही कृष्णाबरोबर बोलू लागल्या दहा, बारा. सोळा जनींनी आपली टोळी करून असे ठरविले की हा नाचताना त्यालाच आपण मिठी मारू मग तो आपले काय करील. त्यानंतर दुसरी आणखी एक म्हणाली की काय सांगू ह्या नागिणीसारख्या बायकां सूर्यतेजाप्रमाणे तेजस्वी आहेत.इतक्यांत मुक्तकेशी असलेल्या दोघी धांवत येऊन कृष्णाला म्हणू लागल्या की तूं येथून निघ आणखी दुसऱ्या तीन गौळणी आहेत. त्या तुला धरतील म्हणून तूं तिन्हींच्या पलीकडे जाऊन राहा. गौळणी सांगतात बाळा कृष्णा सुंदरा असा हा तुझा मनाचा चाळा टाकून दे.असे त्या गोपीचे भाषण ऐकून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, कृष्ण परमात्मा त्याने असे सांगणाऱ्या गोपीचे पवनु गिळिला’ म्हणजे चित्तहरण केले असे माऊली सांगतात.