ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.978
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
अभंग ९७८
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७८
अचिंत बाळक सावध जालें । निशब्दी बोभाईलें मीचि मीचि ॥१॥ गरोदरेविण बाळक जालें । माया मारून गेलें निरंजना ॥२॥ तेथें मज एक नवल पैं जालें । पेहें सूदलें निरालंब ॥३॥ छत्तीस अकरा घोटु पैं घेतला । उदरेंवीण भरले पोट देखा ॥४॥ सहज गुण होतें निर्गुण जालें । भलत्या झोंबलें निराकारें ॥५॥ बापरखुमादेविवरू शून्याहूनि वेगळें । त्या बाळका सामाविलें आपुल्याव्योमीं ॥६॥
अर्थ:-
अविचारी बाळक हे अज्ञानरूपी माया गरोदर न होता जन्माला आले म्हणजे आपणास जीव (सुखी दुःखी) समजू लागले. परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरू माऊली भेंटली व तिने तत्त्वमसि महावाक्योपदेश केला त्यामुळे जागे झाले. म्हणजे ब्रह्माकार वृत्ति निर्माण झाली. व शब्दरहित असलेल्या ब्रह्माविषयी (अहं ब्रह्मास्मि) मी ब्रह्म आहे अशी गर्जना करू लागले.व त्या गर्जनेने अज्ञानरूपी मायेचा निरास करून निर्गुण स्वरूपाकार होऊन ती स्वतः मावळली( ती म्हणजे अहं ब्रह्मास्मि इत्याकारक वृत्ति). त्याठिकाणी या बाळकाला एक आश्चर्य झाले ते असे की हे बाळक ‘पेहें’ म्हणजे पिण्याला योग्य म्हणजे अभेदयोग्य आलंबनरहित निर्विषय अशा स्वरूपाला प्राप्त झाले. त्यामुळे छत्तीस तत्त्वांचे शरीर, दहा इंद्रिये व अकरावे मन यांना गिळून टाकले म्हणून उदरेवीण पोट भरले. म्हणजे शरीरादिकावांचून स्वस्वरूपे करून तृप्त झाले. अज्ञानावस्थेत सहज असणारे गुण नाहीसे होऊन ते सर्व निर्गुण परमात्मस्वरूप झाले. म्हणजे चांगल्या रितीने निर्गुण निराकार परमात्मस्वरूपाशी ऐक्य पावलो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सत्तास्फूर्तिशून्य असलेल्या मायेहून वेगळे असल्याने त्यांनी त्या बाळकाला आपल्या चिदाकाश स्वरूपामध्ये सामावून घेतले.असे माऊली सांगतात.