ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.743
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४३
अमित्य भुवनीं भरलें शेखीं जें उरलें । तें रूप आपुलें मज दावियले वो माय ॥१॥ आतां मी नये आपुलिया आस । तुटले सायास भ्रांतीचे वो माय ॥२॥ मंजुळ मंजुळ वायो गती झळकती । तापत्रये निवृत्ति निर्वाळिलें वो माय ॥३॥ वेडावले एकाएकी निजधाम रूपी । रखुमादेविवरू दीपी दिव्य तेज वो माय ॥४॥
अर्थ:-
अमित्य म्हणजे अनंत निरतिशय आनंदरूप जे ब्रह्म ते चतुर्दश भुवनांत भरून पुन्हा उरले आहे. तेच ब्रह्म माझा आत्मा असून तो मला श्रीगुरू निवृत्तींनी दाखविला. आता आत्म ज्ञानोदयानंतर पुन्हा मी संसाराची आशा करणार नाही. कारण संसारभ्रांतीमुळे होणारे सायास सर्व निवृत्त झाले.आत्मसुखाच्या शांतीचा वारा शीतल झुळु, झुळु येऊ लागल्यामुळे तापत्रयापासून मी अगदी दूर झालो. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल म्हणजे परमात्मा त्या अद्वितीय स्वप्रकाश तेजामध्ये म्हणजे आनंदामध्ये मी अगदी वेडावून गेलो.असे माऊली सांगतात.