ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.725
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२५
इवलेसे रोप लाविलें द्वारी । त्याचा वेल गेला गगनावरी ॥१॥ मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां अतिभारु कळियांसी आला ॥२॥ मनाचिये गुंती गुंफियेला शेला । बापरखुमादेविवरु विठ्ठली अर्पिला ॥३॥
अर्थ:-
आत्मस्वरुपाच्या दारांत इवलेसे रोप म्हणजे कल्पित मायेचा अंगीकार केला. हेच कोणी एक मोगऱ्याचे रोप लावले. अशी कल्पना करुन त्या रोपाचा वेल जी गगनादि सृष्टि ती अति वाढली? त्या मोगऱ्याच्या वेलाची फुले म्हणजे सुखदुःखे हे वेचित असता म्हणजे भोगीत असता मागिल संचिताच्या जोराने नवीन कोट्यवधी देहाच्या कळ्या त्याला आल्या.असा बाई विस्तार करुन श्रीगुरुंच्या सहाय्याने व मनाच्या युक्तिने त्या सर्व फुलांचा एक शेला करुन माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना अर्पण केला.
दुसरा अर्थ असा की.परमार्थाला लागल्यानंतर नामस्मरणाचे लहानसे रोप परमात्म्याच्या दारांत लावले. पण त्याचा विस्तार एवढा झाला की. तो वेल चिदाकाशा पर्यंत वाढत गेला. त्याला ब्रह्मसुखाची फुले आली. ती ब्रह्मसुखाची फुलें जितकी घ्यावी तितकी अधिकच येऊ लागली. सदानाम घोष करु हरिकथा’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सर्वसुख ल्यालो सर्व अलंकार’ अशी सुखाची फुले त्या मोगऱ्याच्या लहानशा रोपाला म्हणजे नामस्मरणाला आली ती फुले मनाच्या दोऱ्यांत गुंफुन त्याचा सुंदर असा शेला तयार करुन माझे पिता व रखुमादेवीवर श्रीविठ्ठलाला मी अर्पण केला. असे माऊली सांगतात.