ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.495
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९५
कवणाची चाड आतां मज नाहीं । जडलों तुझ्या पायीं निश्चयेंची ॥१॥ देह जावो राहो नाहींच संदेहो । न करी निग्रहो कासयाचा ॥२॥ बहुत श्रमलो साधन करितां । विश्रांति तत्त्वता न होयची ॥३॥ तुज वांचोनियां कवणां सांगावें । कवणां पुसावें अनुभव सुख ॥४॥ माता पिता सखा सर्वस्व तूं कीर । म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीसी ॥५॥
अर्थ:-
मला आता कोणाची लाज उरली नाही. माझी चित्तवृत्ती तुझ्या ठिकाणी निश्चित जडली आहे. देह जावो अथवा राहो, मला त्यावर फिकीर वाटत नाही. तसेच कोणत्याच गोष्टीचा निग्रह करीत नाही.सुखप्राप्ती करता निरनिराळ्या साधनांचा उपयोग करुन थकलों. पण खरोखर कोठे विश्रांती अशी मिळालीच नाही या गोष्टी तुझ्यावांचून कोणांस सांगाव्या? व अनुभवाचे सुखही तुझ्यावाचून कोणाला विचारावे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर निवृत्तीनाथास म्हणतात माझे आईबाप मित्र वगैरे तूंच आहेस. असे माऊली सांगतात.