ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.492
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९२
परेहुनी परी वैखरीहुनी दुरी । दुरीहुनी दुरी ब्रह्म आहे ॥१॥ केवीं तुज कळे सांग जीव रूपा । वृथा भ्रम बापा करितोसी ॥२॥ आकाशाचे फळ चित्रींच्या नराशी । केवीं प्राप्त त्यासी होईजेल ॥३॥ जेव्हां तूंचि ब्रह्म होऊनी राहाशी । तेंव्हा वळगशी सर्वगत ॥४॥ हेतु मातु भ्रांति हे तिन्ही गिळून । राहियला मौन ज्ञानदेव ॥५॥
अर्थ:-
ते ब्रह्म परावाणीच्या पलीकडील आहे. मग ते वैखरी वाणीने कसे सांगता येईल? ते ब्रह्म पारमार्थिक सत्तेतील असल्यामुळे प्रातिभासिक व व्यावहारिक सत्तेतील वस्तूहून ते फारच दूर आहे. ब्रह्म पारमार्थिक सत्तेतील असल्यामुळे व्यवहारिक सत्तेतील जीवत्व धारण करणारा जो तूं त्या तुला ते ब्रह्म कसे कळेल जीवत्वदशा कायम ठेऊन ब्रह्म कळावे असे जर वाटत असेल तर तूं फुकटच भ्रम का करित आहेस. आकाशाचे फळ चित्रांतील मनुष्याला खावयास द्यावे असे म्हणणे जसे मुर्खपणाचे आहे. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी जीवदशा कायम ठेवन ब्रह्म कळावे असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.जेव्हां तूं स्वतः यथार्थज्ञान करून घेऊन ब्रह्मरूप होशील तेंव्हा तें सर्वव्यापक ब्रह्म तुला अनुभवाला येईल. माया व मायाकार्य पदार्थ यांची भ्रांती टाकून देऊन ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी मी मौनरूप धारण करून स्वानुभव स्थितीत राहिलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.