ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.178
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७८
लक्ष लावून अंतरी । कृष्णा पाहाती नरनारी । लावण्य सागरु हरि परमानंदु ॥ छंदे छंदे वेणु वाजे । त्रिभुवनी धनुगाजे । उतावेळ मन माझे । भेटावया ॥ ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोवळा । श्रुति नेणवे ते लीळा । वेदा सनकादिकां ॥ भूतग्रामीचा परेशु ।
तापत्रयाचा करीं नाशु । आड धरुनी गोपवेषु । वत्से राखे ॥ रासक्रीडा वंदावनीं खेळे । इंदुवदन मेळे । उद्धरी यदुकुळे । कुळदीपके ॥ निवत्तीदासाचा दातारु । बापरखुमादेविवरु । भक्तां देतो अभयकरु । क्षणक्षणामाजीं ॥
अर्थ:-
परमानंद व लावण्याचा सागर असलेल्या कृष्णाकडे नरनारी अंतरातुन लक्ष देऊन पाहतात. त्याच्या सुमधुर वेणुवादनाने संपुर्ण त्रिभुवन कोंदाटुन गेले आहे व त्या मुळे त्याला भैटायला मी उताविळ आहे. जो ब्रह्मविद्येचा पुतळा आहे तो गाई राखत आहे हि लीला वेद व श्रुतीना ही कळत नाही. जो ह्या जगताचा राजा आहे जो सर्व प्रकारचे तापाचे हरण करतो तो गोपवेश करुन गोधन राखत आहे.
यदुकुळातील त्या यादवाने आपल्या मुखकमलाने मोहित करुन त्या गोपाना रासक्रीडा करायला लावली व त्यांचा उध्दार केला. माझे पिता व रखुमाईपती व माझे गुरु निवृतीनाथ असे दाता आहेत की क्षणात आपल्या भक्तांना अभय देतात असे माऊली सांगतात.