ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.786
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८६
चौ तेरा आम्ही चौसष्टीचे भागे सांचिलें । तें एका ऋणाईतें घेतलें वोळखीवीण ॥१॥ आपुलें अकरांचे एक सोईरें जाणा । तेंही पैं तयासी मिळोनी ठेलें ॥२॥ आतां मी चौघापासीं जाईन तिहींचि नागविले पाहीं । तेथें कांहीं नाहीं ऐसे म्हणितलें ॥३॥ ऐसा देहाचा दिवाळखोर दुसऱ्यासी घेऊनि गेला । तेणें मज दाखविला अद्वैत पारू ॥४॥ सहस्रापरी कांहीं धरियेली जरी । ज्ञानमूढे तरी कायी जाणती ॥५॥ ऐसा बापरखुमादेविवरू विठ्ठलु मध्यवर्ती भला । तेणें उगाणा होऊनियां ॥६॥
अर्थ:-
चार आणि तेरा मिळून सतरा संख्या होते. या सतरा तत्त्वाचे लिंग शरीर आहे. त्या लिंग शरीराच्या ठिकाणीच चौसष्ठ कला असतात. त्या लिंग शरीराने चौसष्ट कलांच्या सहाय्याने जे देहात्मभावाचे धन साचविले त्याला परमात्म्याची बिलकुल ओळख नव्हती परंतु त्याच्या प्राप्तीची इच्छा होती. त्या ऋणाईताने आमचे ते सर्व धन घेतले. व देहात्मभावामध्ये आमचे सगे सोयरे असलेले पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय व एक मन हे अकरा आहेत. हेही त्यालाच मिळून गेले. म्हणजे त्यांनाही त्याचाच वेध लागून गेला. आतां मी चार वेदापाशी जाईन आणि असे का झाले म्हणून विचारेन. म्हणावे तर त्यानीच मला कसे नागवून टाकले आहे पाहा. ते केला परावृत्त
म्हणतात त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी देहादिअनात्मपदार्थ काही एक नाहीत. याप्रमाणे देहाचा दिवाळखोर म्हणजे देहसंबंध ज्याच्या ठिकाणी मुळीच नाही (असा परमात्मा) इतकेच नाही तर दुसऱ्याच्या देहसंबंधालाही तो घेऊन गेला. अशा रितीने अद्वैत स्वरूपरुपी पलीकडचा तीर मला दाखविला. ज्ञानशून्य पुरूषानी असल्या परमात्म्याला जाणण्याचे हजारो प्रकार केले तरी त्यांना तो कळेल काय. त्या परमात्म्याची आणि जीवाची गाठ घालून देण्याला म्हणजे जीवाला परमात्म्याचे ज्ञान करून देण्याला माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मध्यस्थ पाहिजे. त्याच्याच कृपेने मी संसारापासून परावृत्त होऊन परमात्मस्वरूपाचा लाभ करून घेतला असे माऊली सांगतात.