ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.761
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६१
नवांची खाणी दहाव्याने शोकिली । अकराव्याने जाली देशधडी ॥१॥ तें ब्रह्मपंथीं माखलें ब्रह्मपंथीं माखलें । मरोनी जागृत जालें मन गे माये ॥२॥ अवघे अंबर माझें तिंबलें । ब्रह्मरसें पिळिलें वो रंग नव्हे ॥३॥ सारवियोगें माझें कर्म बुडालें । निष्कर्म जालें म्हणोनी नातळे ॥४॥ जागृति स्वप्न बुडाली । रखुमादेविवरें सहित गिळिली ॥५॥
अर्थ:-
श्रोत्र इंद्रियावांचून बाकीची नव इंद्रियांची खाण दहाव्या श्रोत्र इंद्रियाने महावाक्यश्रवण करून शोषण करून टाकले. आणि अकरावें जे मन त्याने तर या देहभावाला देशोधडीला लावले. अशारितीने या ब्रह्मपंथात मारले जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन जागे झाले. माझे मनरूपी वस्त्र हे ब्रह्मरसामध्ये पिळले. परंतु कसलाही रंग आला नाही. अज्ञानी जीवांनी साररूप मानलेला जो प्रपंच त्याचा माझा वियोग झाल्यामुळे त्याचे पोषक जे कर्म ते बुडाले. म्हणजे संचित क्रियामाण या सर्व कर्माचा दाह होऊन मी निष्कर्म म्हणजे परमात्मरुप झाले. म्हणून लोकदृष्ट्या कर्माचा भोग असला तरी त्यांत मी गुंतत नाही. आता माझी जागृती, स्वप्न, सुषुप्ति हे सर्व बुडाली. म्हणजे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी देहासहित गिळून टाकले. असे माऊली सांगतात.