ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.615
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१५
अधिक देखणे तरी निरंजन पहाणें । योगीराज विनविणे मना आले वो माये ॥१॥ देहवळी देउनी साधिलें म्यां साधनीं । याने समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फिटलें मायाछंदा साठवलें । सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माय ॥३॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला । तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंचा पहाणें । निजानंदी राहाणे स्वरूपी वो माये ॥५॥ ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू । विठ्ठलीं निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥
अर्थ:-
व्यवहारोपयोगी ज्ञान कमी अधिक प्रमाणाने सर्व जीवांना आहेच पण त्या सर्वा पेक्षा अधिक महत्वाचे ज्ञान असेल तर ते निरंजन म्हणजे परमात्म्याचे ज्ञान होय.नामाकरिता योगीराज जे श्रीगुरू त्याची विनवणी म्हणजे सेवा करून देह त्यांना देऊन ते ज्ञान मी प्राप्त करून घेतले. आणि मला समाधान झाले. मायेच्या नादात साठवलेली व्यंगता म्हणजे देहतादात्म्यबुद्धि नाहीशी होऊन परिपर्ण आत्मस्वरूप ज्ञान झाले. पिंपळाला सुवास नाही. पण तो चंदनाच्या वासाने भरुन जावा त्याप्रमाणे त्या आकारवान जगतात.मी निराकार परमात्मा पाहिला. यानंतर प्रापंचिक ज्ञान पाहाणे पुरे स्वकीय आत्मानंदात राहाणे बरे. रखमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ज्ञानाचा समुद्रच आहेत. असा निश्चय करून मी त्यांना पाहिले. असे माऊली सांगतात.