ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 550
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५५०
अमानत्व स्थिती ते अंतीं कठीण । येरा जन्म जाण न साधेची ॥१॥ अनपेक्ष शुचि जे का उदासिन । अमानत्व जाण त्यासी लाभे ॥२॥ सहज ज्ञानेश्वरी अखंड समाधी । ग्रासूनि उपाधि राहियला ॥३॥
अर्थ:-
भगवद्गीतेत सांगितलेली अमानित्व स्थिती प्राप्त होणे फार कठीण आहे कित्येकांना जन्मभर साधत नाही. अनपेक्षत्व, शुचित्व, उदासीनत्व इत्यादि गण ज्यांनी संपादन केले असतील त्यानांच अमानित्व प्राप्त होते. मी सर्व उपाधिचा बाध निश्चय करून ग्रास करुन टाकला. त्यामुळे मला सहज अखंड समाधी लाभली. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.