ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.775
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७५
उन्मनि अवस्था लागली निशाणी । तन्मयता ध्यानीं मुनीजनां ॥१॥ मन तेथें नाहीं पहासी रे तें काई । सर्व हरिडोहीं बुडी दे कां ॥२॥ मनाची कल्पना देहाची भावना । शून्य ते वासना हरिमाजीं ॥३॥ निवृत्ति म्हणे सर्व हरिपीक फळलें । ज्ञानासी लाधलें हरिकृपा ॥४॥
अर्थ:-
मुनि लोकांना योगाभ्यास करते वेळी ध्येय ब्रह्माशी तन्मयता होत असल्यामुळे जसी उन्मनी अवस्था प्राप्त होते.त्याप्रमाणे मी ब्रह्मरूप आहे. असे ज्ञान मला झाल्यामुळे माझी ही तसीच स्थिति झाली आहे. त्या स्थितित विचार करावयास मनही मनपणाने न उरल्यामुळे विचार तरी कसा करणार? मी देह आहे. अशी समजूत व मन ही दोन्ही हरिस्वरूपांत नाहीसी झाली. मी देहरूप आहे ही मनाची कल्पना नाहीशी होऊन सर्व हरिरूप झाले. निवृत्तिनाथ म्हणतात. हरिच्या कृपेने हरिच्या यथार्थस्वरूपाचे ज्ञान होऊन सर्व जगतरुपानेही तोच नटला आहे. असे ज्ञान मला त्यांच्या कृपेनेच प्राप्त झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात