ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.764
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६४
मन हे राम जालें मन हे राम जालें । प्रवृत्ति ग्रासुनी कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥ यमनियम प्राणायाम प्रत्याहार संपादिलें । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसें समाधीसी आलें ॥३॥ बोधी बोधलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हरपलें ॥४॥
अर्थ:-
श्रीरामाच्या नामस्मरणामुळे माझे मन हे रामरुप झाले याची खूण मनाची सहज प्रवृत्ति नष्ट होऊन ते निवृत्ति रुपाला प्राप्त झाले.याचे साधन श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन त्याचप्रमाणे यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार ध्यान, धारणा, आसन व मुद्रा संपादन करुन कसे आपोआप समाधीला आले.शेवटी बोध्य व बोधकता आणि बोध ही त्रिपुटी नाहीसी झाली.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनीच माझे मीपण नाहीसे केले. असे माऊली सांगतात.