ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.752
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५२
रूप सामावलें दर्शन ठाकलें । अंग हारपलें तेचि भावीं ॥१॥ पाहों जाय तव पाहाणया वेगळें । ते सुखसोहळे कोण बोले ॥२॥ जेथे जाय तेथें मौन्यचि पडिलें । बोलवेना पुढें काय करूं ॥३॥ सरिता ना संगम ओघ ना भ्रम । नाहीं क्रिया कर्म तैसें झालें ॥४॥ जाणों जाय तंव जाणणिया सारिखें । नवल विस्मयें कवण सांगों ॥५॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलुचि अंगी । निवृत्तिराये वेगी दाखविला ॥६॥ तोचि सबराभरितु रूपनामरहितु । अपरंपार मी तूं नीच नवा ॥७॥
अर्थ:-
ब्रह्मात्मसाक्षात्कार अंतःकरणांत ठसावला म्हणजे त्या अद्वैत स्थितिमध्ये ज्ञानाचा व्यवहार थांबतो व देहभाव नष्ट होऊन परमात्मस्वरूप होतो. विचार करू गेले तर पाहणारा हाही भाव त्याठिकाणी वेगळा राहात नाही. त्या परमात्मसुखाचा सोहळा कोण सांगेल. कोणत्याही रितीने बोलले तरी मौनची पडते. म्हणजे शब्द मावळून जातो या अडचणीमुळे परमात्मसुखाचे कोणत्याही शब्दाने वर्णन करता येत नाही.याला काय करू. नदी समुद्राला मिळून समुद्ररूप झाल्यानंतर, ‘सरिता संगम ओघ’ इत्यादी म्हणणे भ्रम आहे. त्या प्रमाणे त्या अद्वैत आत्मस्थितीमध्ये क्रिया, कर्मादिकाचा काही संबंध नाही. जाणावयास जावे तर जाणण्या सारखी ती वस्तु नाही. अशा आत्मस्थितिचा विलक्षण अनुभव मी घेतला. काय आश्चर्च आहे. ते कोणाला सांगावे. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल ते माझ्या अंगी निवृत्तिरायांने दाखविले. आतां त्यांची स्थिति काय सांगू ! ते नित्य नूतन, नामरूप,आदि अंतरहित सभराभरित म्हणजे अंतर्बाह्य तोच आहे. असे माऊली सांगतात.