ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.603
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०३
आदि मध्य प्रांत टाकोनी वासना । करु हरिध्याना सोहंभावें ॥१॥ दिवसा कामा न रात्रीचा बडिवारु । हरि सहपरिवारु जाला आम्हां ॥२॥ जातीची विजाती नाही पैं कुळधर्म । कुळीचा कुळकर्म हरि आम्हां ॥३॥ ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर । सांगतसे विचार आम्हां तुम्हां ॥४॥
अर्थ:-
जगताची उत्पत्ति, स्थिती, अंत तसेच वासना या सर्वाचा विचार टाकून देऊन श्रीहरिचे सोहं रुपाने आपण ध्यान करु.आता या श्रीहरिच्या ध्यानाशिवाय दिवसा व रात्री कांही एक काम उरलेले नाही. कारण आमच्या प्रपंचात सगळा परिवार हरिच झाला आहे.आम्हाला कुळधर्म, जातीचा आगर विजातीचा कांही एक संबंध उरला नाही. अशी स्थिती झाल्यामुळे आमच्या कुळातला कुळधर्म एक हरिच बनला आहे. थोर अशा वेद शास्त्रांनी हाच विचार तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.