ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.494
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९४
भुलणे चालणें ईश्वराशी नाहीं । जैसा असे पाही तैसा असे ॥१॥ जरी भिन्नभेद तरी सर्वज्ञत्व । कासया समत्व नाम त्यासी ॥२॥ सूर्याशी प्रकाश सूर्यचि करीत । ईश्वर जाणत ईश्वराशी ॥३॥ आपुली पोकळी आकाशचि जाणे । ईश्वरचि लेणे जग लेई ॥४॥ सहज अभेद वस्तु अगोचर । म्हणे ज्ञानेश्वर तेंचि रूप ॥५॥
अर्थ:-
विसरून जाणे, चालणे, वगैरे क्रिया परमात्म्याला नाही. तो जसा आहे, तसाच आहे. जर वेगवेगळे क्रियारूप भेद त्याच्याठिकाणी असतील तर त्याला सर्वज्ञ सर्वव्यापी कसे म्हणता येईल. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रकाशन सूर्यच करतो. त्याप्रमाणे ईश्वरच ईश्वराला जाणतो. किंवा आपली पोकळी आकाशालाच कळते. त्याप्रमाणे जगद्रूप अलंकार घातलेले ईश्वराचे स्वरूप ईश्वरालाच माहित. जी अव्यक्त व भेदरहित वस्तु तेच ईश्वराचे खरे स्वरूप आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.