ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 562
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५६२
नेणण्याचें रुप तेंचि रे अज्ञान । जाणते ते ज्ञान दोन्ही मिथ्या ॥१॥ पूर्णाची ओळखी मुळीं माया नाहीं । कोण मी हे पाहीं शोधूनियां ॥२॥ अनुभव सुख भोगितांना भोग । न होता अव्यंग भाररुपें ॥३॥ बद्धमुक्त शून्य होसी निराकार । म्हणे ज्ञानेश्वर तत्त्वज्ञानी ॥४॥
अर्थ:-
मला काही माहीत नाही. असे म्हणणे याचे नाव अज्ञान, व मला माहित आहे असे म्हणणे म्हणजे ज्ञान पण ही दोन्ही ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने मिथ्या आहेत.ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी माया नावांची वस्तु मुळीच नाही. हे मी कोण आहे. याचा विचार करुन पहा, म्हणजे कळेल ते समजल्यावर आत्मसुखाचा भोग होईल. पण त्या आत्मसुखाच्या भोगाला भोग असे म्हणता येणार नाही. कारण आत्मा आपल्या स्वरुप ऐश्वर्याने अव्यंग आहे.तत्त्वज्ञानाचे दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी बद्ध मुक्त हे भाव जाऊन तूं निराकार आत्मरुपच राहशील. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.