ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.976
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
अभंग ९७६
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७६
निशियेचे भरी भानु प्रतिबिंबी बिंबला । बिंबचि गिळुनी ठेला बिंबामाजीं ॥१॥ रात्रि सूर्य वाहे दिनु चंद्र जाये । विपरीत गे माय देखियेलें ॥२॥ उदय ना अस्तु तेथें कैचेनि त्रिगुण । आपणचि दर्पण होऊनि ठेला ॥३॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवीं तोचि जाणे । संत ये खुणे संतोषले ॥४॥
अर्थ:-
‘अविद्येचिया निदा, या माऊलीच्या उक्तीप्रमाणे किंवा अविद्यावच्छिन्न जीव व मायोपाधी ईश्वर या मताने अविद्येच्या आवरणामुळे भानु म्हणजे परमात्मा बुद्धित आणि तो जीव जेंव्हा प्रतिबिंबीत झाला. आत्मस्वरूपा विषयी विचार करू लागला. तेंव्हा विचारांती प्रतिबिंब सापेक्ष बिंब हा भाव जाऊन परमात्मरूप झाला. याचे कारण विचारांती बुद्धिरूपी रात्रीत परमात्म रूपी सूर्य प्रकाशमान झाला. त्यामुळे विद्यारूपी दिवसांत आनंदवाप्तीरूपी चंद्र प्रकाशला. हे सर्व जगत दृष्टिने विपरीत आहे. परंतु तात्त्विक दृष्टिने पाहिले तर मूळ स्वरूपाचे ठिकाणी ज्ञान, अज्ञान नाही मग सत्त्व, रज, तम हे गुण कसे असणार? उलट त्रिगुण कार्य जो विश्वाभास त्याला आपणच दर्पण आहे ही गोष्ट जो अनुभवी असेल तोच जाणेल आणि संत त्या खुणाच्या भाषणाने संतोष पावतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात.