ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.921
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२१
दुरळु अंबुला केला गे बाई । ब्रह्मादिकां तो न पडे ठाई ॥१॥ हालों नये चालों नये । सैरावैरा कांहीं बोलों नये ॥२॥ अंबुला केला धावे जरी मन । बुडती बेचाळीस जाती नाक कान ॥३॥ मागील केलें तें अवधेची वावो । बापरखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥४॥
अर्थ:-
इंद्रिये, मन, बुद्धि त्यांची कारण पंचमहाभूते, त्यांचे कारण अविद्या इतक्यांहून दूर असलेल्या ब्रह्मादिकांना कळत नाही त्याला मी पति केला. त्या पतिस्वरुपाच्या ठिकाणी चलनवलन वगैरे क्रिया किंवा कोणत्याही तहेचे भाषण खपत नाही. आतां आनंदघन पति करुन जर मन प्रपंचाकडे धांवेल तर बेचाळीस कुळे नरकांत पडून नाक कान जातील. म्हणजे सर्वप्रकारे फजिती होईल. एकदा त्या परमात्म्याला पति केला म्हणजे मागील देहात्मभावादि सर्वच खोटे होऊन जातात. असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझा पति आहेत असे माऊली सांगतात.