ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.910
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९१०
शामाचिया घरा वासना नेती । मनें मन गुंती तये रूपी ॥१॥ बिंबाचे स्वरूप छाया पैं घनदाट । दिननिशी अविट शामतेज ॥२॥ तें रूप देखिलें कोण्या भाग्ययोगें । निवृत्तिप्रसंगें आम्हां घरीं ॥३॥ दिठिवेचेनि वोपे सानुलें स्वरूप । मुराली वालिप कल्पनेची ॥४॥ सांठवले आकार इंद्रियांच्या वृत्ती । शामतेजें दीप्ती धवळलें ॥५॥ निराशा संचली आशा पै हे सार । अमारी अमर तनु जाली ॥६॥ बापरखुमादेविवर विठ्ठली गळालें । ब्रह्मसुख सोहळे आम्हां घरीं ॥७॥
अर्थ:-
काय माझे भाग्य उदयाला आले म्हणून सांगू श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या संगतीने आमच्या अंतःकरणांत शामसुंदर परमात्म्याचा अविर्भाव झाला. त्यामुळे सर्व वासना शामरूप परमात्म्याच्या घरांकडे जातात मन त्याच्याच ठिकाणी गुंतुन राहाते. बिंबरूप परमात्याची छायाच चहुकडे पसरून गेली आहे. म्हणजे सर्वत्र तोच दिसत आहे. त्याचा केव्हाही वीट येत नाही. असा तो अविट आहे. दृष्टीचा विषय म्हणून लहान स्वरूप धारण करतो. त्याचे ठिकाणी सर्व कल्पना मुरून जाते. अविद्याकार्य नामरूपादि इंद्रियाच्या वृत्ति त्याच्यातच लय पावून त्या शामसुंदर श्रीकृष्णाच्या रूपानेच सर्व विश्व प्रकाशीत झाले.आशा निराशा ह्या सर्व सारस्वरूपात प्रवेश करून अजरामर परमात्म्याच्या ठिकाणी नाहीशा होऊन गेल्या. त्यामुळे आम्ही अमर झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे ठिकाणी सर्व वृत्ति लय पावल्यामुळे आमच्या घरांतच ब्रह्मसुखाचा सोहळा भोगावयास मिळाला आहे. असे माऊली सांगतात.