ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.780
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८०
निरालंब स्तंभ घातला निजयोगु । साही वेगळेसी वो माय ॥१॥ आणिकां न कळे तें त्रिगुणां वेगळे । तें मज गोवळें दाविलें वो माय ॥२॥ दुर्घट घडतां न वर्णवे योग्यता । मज पुढारी वो माय ॥३॥ खुणा जरी बोलों तरी मौन्य पडलें । तें परब्रह्मीं उघडलें दिव्यचक्षु वो माय ॥४॥ तो चिदानंदु पुतळा रखुमाई जवळा । सोईरा सकळांसहित वो माय ॥५॥
अर्थ:-
जो दुसऱ्याच्या आश्रयावर नाही स्वतःच्या वर आहे. साही शास्त्रांना ज्याचे विधिमुखाने प्रतिपादन करता येत नाही. जो दुसऱ्यास ज्ञेयत्वाने कळणे शक्य नाही. कारण तो त्रिगुणातीत आहे. परंतु श्रीगुरूनिवृत्तिरायांनी ते श्रीकृष्ण रूप मला प्रत्यक्ष दाखविले. त्याचे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. कारण तो शब्दाला विषय नाही. तरी पण तो आज माझ्या डोळ्यापुढे उभा आहे. कांही खुणेने बोलावयाचा प्रयत्न करावा.तर वाणी मुकी होते. त्या परब्रह्माच्या दर्शनास योग्य होतील असे डोळे श्रीगुरूनी उघडले..त्यामुळे सच्चिदानंदरूप असलेला व सर्वांचा जिवलग असलेला असा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मी पाहिले. असे माऊली सांगतात.