ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.744
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४४
शुद्धमतीगती मज वोळला निवृत्ति । त्याने पदोपदी प्रीति स्वरूपीं वो माय ॥१॥ आतां मी जाईन आपुलिया गांवा । होईल विसावा सुखसागरीं वो माय ॥२॥ पाहतां न देखे आपुलें कोणी नाहीं । निजरूप पाहीं अनंता नयनीं वो माय ॥३॥ हा रखुमादेविवरू गुरूगम्य सागरू । न करीच अव्हेरू माझा वो माय ॥४॥
अर्थ:-
माझी बुद्धी शुद्ध आणि आचरण ही शुद्ध असल्यामुळे माझेवर श्रीनिवृत्तिरायांनी ‘पदोपदी’ म्हणजे पावलो पावली आत्मज्ञानाचा उपदेश करून आत्मस्वरूपावर प्रीति उत्पन्न केली.आता मी आपल्या गांवाला म्हणजे परमात्म स्वरूपाला जाईन म्हणजे सुखाच्या सागरांतच मला विसावा प्राप्त होईल. सर्वात्म भाव झाल्यावर विचार करून पाहिले तर जगत म्हणून सत्यत्वाने पदार्थ दिसत नाही. मग माझे आप्तइष्ट कोणी दिसत नाही हे निराळे सांगण्याची जरूरीच नाही. कारण ज्या अंतःकरणाच्या डोळ्याने मी अद्वैत पाहणार त्या अंतःकरणात माझे निजरूप जो अविनाश परमात्मा तोच येऊन बसला आहेना. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते कृपेचा सागर असून श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या मुळे ते माझा केंव्हाही अव्हेर करणार नाहीत. असे माऊली सांगतात.