ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.715
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१५
शर्करेची गोडी निवडावया भले । साधु निवडिले सत्संगती ॥१॥ सत्संगें प्रमाण जाणावया हरि । येर ते निर्धारी प्रपंचजात ॥२॥ भानुबिंब पाहा निर्मळ निराळे । अलिप्त सकळ तैसे साधु ॥३॥ ज्ञानदेव हरि जपोनी निर्मळ । सदा असे सोज्वळ निवृत्तिसंगे ॥४॥
अर्थ:-
परमात्म्याची गोडी निवडण्याचा अधिकार महान महान संतांनाच आहे. म्हणून हरिला ओळखण्यांला एक सत्संगतीच पाहीजे. इतर लोंक असले तरी त्यांना प्रपंचाची माहिती असेल. पण श्रीहरिची ओळख करून देणारे एक साधुच आहेत. जसे पाण्यांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडलें तरी सूर्य त्याहून अलिप्त आहे. त्याप्रमाणे साधुसंत प्रपंचात वागत असूनही अलिप्त असतात. श्रीहरीच्या जपाने मी निर्मळ होऊन अत्यंत पवित्र अशा निवृत्तीरांयाच्या संगतीत सदा आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.