ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.708
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-६ वे, संतपर अभंग ७०८
रामकृष्ण जप सोपा । येणें हरती जन्मखेपा । संसारू तुटेल महापापा । धन्य भक्त तो घरातळीं ॥१॥ जया हरीची जपमाळी । तोचि पडिला सर्व सुकाळीं । तया भय नाहीं कदाकाळी । ऐसें ब्रह्मा बोलियेला ॥२॥ बापरखुमादेवी हरि । नामे भक्तासी अंगिकारी । नित्य सेवन श्रीहरि । तोचि हरीचा भक्त जाणावा ॥३॥
अर्थ:-
साधनामध्ये रामकृष्ण नामाचा जप करणे हे सुलभ आहे. व तो जो करील त्याच्या जन्ममरणाच्या येरझारा नाहीशा होऊन तसेच त्याची मोठी पातके नाहीशी होतात. असे भक्त भूतलावर मोठे धन्य आहेत. हरिनामाचा जप करणाऱ्याला केंव्हाही दुष्काळ नाही. तसेच कोणत्याही काळी त्याला भय नाही. या प्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितले आहे.माझे पिता रखुमादेवीचे पती बाप जे श्रीविठ्ठल ते आपल्या भक्तांचा अंगीकार करतात. जे सतत हरीनामाचे चिंतन करतात तेच खरे हरीचे भक्त समजावे. असे माऊली सांगतात.