ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.681
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८१
कुटाकूट अंती कूटस्थ पैं जालें । अशेष उरलें त्या वेगळें गे माय ॥१॥ गुणा भ्यालें म्हणोनी निर्गुण पैं जालें । ते निराकार आथिले माझ्या अंगीं ॥२॥ बापरखुमादेविवरू अधऊर्ध्व वेगळें । अर्धमातृका सामावलें अशेष परेसहित ॥३॥
अर्थ:-
परमात्मस्वरूपाविषयी विचार करू गेले असता मीस्वतःच परमात्मरूप झाले. सगुण परमात्म्याचे गुणाचा विचार करीत असता मीच निर्गुण निराकार आपल्याठिकाणी झाले. तो परमात्मा स्वतःच्या मूळ स्वरूपाने निराकार आहे. ते त्याचे निराकारत्व माझ्याच अंगी बाणलें. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ऊर्ध्व म्हणजे वरचे लोकांत अध म्हणजे पाताळांत आहते. असे मुळीच नाही. जो अकार, उकार, मकार, या सर्वांचा लय ज्या अर्धमात्रेमध्ये परावाणीसह होतो. तोच सर्वत्र ओतप्रोत भरला आहे. आणि तोच माझ्या स्वरूपाने नटला आहे. अशी माझी स्थिती झाली. असे माऊली सांगतात.