ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.668

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६८

जाणों गेलें तंव जाणणे राहिलें । पाहों गेलियें तंव तेंचि जालें गे माये । इंद्रियांसहित चित्त ठकलेंचि ठेलें । मी माझें विसरलें स्वयें भाव ॥१॥ ऐकोनी देखोनी मन होय आंधळे । परतोनी मावळे नाहीं तेथें ॥२॥ अविद्या निरसली माया तुटली । त्रिगुण साऊली तेथे रुप कैचें । चांग विचारिलें विवेकें उगवलें । ज्ञान हरपलें तयामाजीं ॥३॥ मुकियाचे परी आनंदु भीतरीं । अमृत जिव्हारी गोड लागे । बापरखुमादेविवरु विठ्ठलु जाणे । संत ये खुणें संतोषले ॥४॥

अर्थ:-

मी परब्रह्माला जाणून घेण्याकरिता गेलें तो माझे ठिकाणचा जाणणेपणाच नाहीसा झाला. याचा अर्थ अज्ञानाची निवृत्ति झाल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञानही उरले नाही. मी परमात्मरुप झाले. इंद्रियांसह वर्तमान चित्त नाहीसे होऊन मी माझा असा देहभावच विसरुन गेले. आतां माझी स्थिती कशी झाली म्हणाल तर कानांनी ऐकणे, डोळ्यानी पाहाणे. वगैरे इंद्रियाच्या क्रिया करण्यांविषयी मन आंधळे झाले. पुन्हा विचार करुन पाहावे तो ही सर्व तेथें नाहीसीच होतात. कारण मूळ अविद्या नाहीसी झाली म्हणजे मोह नाहीसा होतो. अविद्याच नाही मग त्याठिकाणी रुप कशाचे? हे परमात्म स्वरुप चांगला विचार करुन पाहिले. तेव्हां तें आपोआप अंतःकरणांत उत्पन्न झाले. आणि माझ्या ठिकाणी ज्ञान आहे. असे मी समजत होते. ते ज्ञानही परमात्मरुप झाले. मुक्याचा आनंद ज्याप्रमाणे त्याला बोलता येत नाही. त्याप्रमाणे. आत्मानंदाचे अमृत अंतःकरणांतच गोड वाटते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या हृदयातील ही सर्व स्थिती जाणतात व ह्याच खुणेने संत संतुष्ट होतात. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *