ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.628
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२८
चौदारवंटा ओलांडुनि वोजा । अंतरी आत्मकाजा बोधिलें वो माय ॥१॥ आनंदाचे चक्षु उघडी पातीं । शब्दांनि शब्दा अतीति मी जहालिये वो माय ॥२॥ पांगुळे इंद्रियें ग्राम संवादें आत्मारामु । तो ईश्वरू पुर्णकामु मज भेटवा वो ॥३॥ तेथें गोरस जहालें ज्ञाना अंतरीं वोजावलें । सदैवपण आले मज वो माय ॥४॥ पाहतां ठेंगणे डोळे न्याहाळितां आगळे । तें पदप्राप्ती वेगळें सगुणनिर्गुण वो माय ॥५॥ ऐसा हा दिपीं दीपपरनायकू । रखुमादेविवरू एक जोडला वो माय ॥६॥
अर्थ:-
जागृति, स्वप्न सुषुप्ति व तुर्या या चारी अवस्था मागे टाकून त्या पलीकडे अधिष्ठान रूपाने असणारे जे आत्मचैतन्य त्याचे ज्ञान मला झाले. प्रवृत्ती व निवृत्ति हे दोन आनंदाचे डोळे त्यांची पाती उडाल्यामुळे म्हणजे प्रवृत्ति व निवृत्ती ह्या दोन दूर झाल्यामुळे शब्द व निःशब्द या दोन्ही धर्माहून वेगळे जे आत्मतत्व ते मीच झाले. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी इंद्रिय समुदाय पांगळा व्यवहारशुन्य झाल्यामुळे सर्व जीवांचा नित्य, पूर्ण काम जो ईश्वर तो मला भेटला.त्या ज्ञानरूप परमात्म स्वरूपाचे अंतरी घरांत सदैवरस आनंदरूपता प्राप्त झाली. ते ज्ञानाचे डोळे पाहू लागले तो त्या दृष्टीला ब्रह्मांड ठेंगणे झाले. त्या ब्रह्मपदीं वास्तविक सगुण किंवा निर्गुण हे भावच राहात नाहीत. कारण ते ब्रह्म गुणातीत आहे.या रितीने ‘दीपी दीप’ म्हणजे यश्चावत ज्ञानाचे ज्ञान जे रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, ते मला प्राप्त झाले आहेत. असे माऊली सांगतात.