ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.332
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३२
शहाणीयाची दासी होईन कामारी । तो अनुसरु तेथें नव्हेरी । चित्तासारिखा मिळो गोंवळू रानींचा । तो मज मेरु कनकाचा गे बाई ये ॥ लक्ष असो त्या मुर्खाचे गोठी । परी तो नाणावा माझिये दृष्टि । कर्पूराची राशी कुल्लाळ नासी । कवण साहे त्याची तुटी गे माये ॥ अविंधे मोतिये तेजें सुढाळे सोहरुं जाणे ते शहाणे । टाकियाच्या घावीं पाषाण विंधिती तैसे । त्या मूर्खाचे जिणें गे बाई ये ॥ चंदनाच्या दृती वेधिल्या वनींच्या वनस्पती । परी तो वेळ न वेधे चित्तीं । उदकामाजीं जैसी कां पाषाणाची वस्ती । तैसी त्या मूर्खाची संगती गे बाई ये ॥ भ्रमरु काळा भोगी पुष्पयाती सकळा । तेथे म्हैसा येवो नेदावा जवळा । परिसु पाषाणाचा परिं तो गुणें आगळा । तैसा वैष्णव मिळो मज दुबळा गे माये । ऐसा सकळ कळा भोगिसी । नंदरायाचा गोवळु म्हणविसी। बापरखुमादेविवरा विठ्ठला तुज । न विसंबे अहर्निशी रया ॥
अर्थ:-
मी संतांच्या घरची दासी होईन कारण ते वेळ नाही म्हणुन परमात्म विषयक ज्ञान देण्यास कुचराई करणार नाहीत. ते गुराखी कृष्ण मला मिळाला तर माझ्या साठी ते सोन्याचा पर्वत मिळाल्यासारखे आहे. अधमाचे धन मला नको कारुराची रास कुंभाराच्या काय उपयोगाची. तो ती जाळुच टाकेल. त्याचे कितीही साहित्य असले तरी तो कापुर जाळुच टाकेल. छिद्रांकित मोत्याला ओळखुन त्याचा उपयोग करणारे तज्ञ असतात. टाकीच्यी घावाने जसे दगड फुटतात तसे मुर्खाचे जगणे असते. चंदनाच्या संगतीने वन सगळे जरी सुगंधित झाले तरी पण वेळूला त्याचा सुगंध होत नाही. पाण्यात दगडाची वस्ती असते. पण तो थोडा सुद्धा मऊ होत नाही. तशी मुर्ख संगतीती स्थिती आहे. भ्रमर काळा असला तरी सगळ्या फुलांचा सुगंध घेण्यास अधिकारी आहे. त्याठिकाणी रेडा आणून त्याचा काय उपयोग? परिस हा दगड खरा पण इतर दगडापेक्षा लोखंडाला सोने करण्याचा त्याचा केवढा मोठा गुण आहे पहा त्याचप्रमाणे सगळीच मनुष्ये असतात. पण आपल्या संगतीतल्या लोकांना भगवतप्राप्ती करुन देण्याचा अधिकार वैष्णवांचे ठिकाणी असतो. असा वैष्णव गरीब का असेना त्याची संगती मला प्राप्त होऊन तेच मला भगवान श्रीकृष्णाला मिळवुन देतील. हे श्रीकृष्णा तू सर्व कलांचा उपयोग घेणारा असून स्वतःला नंदराजाचा गुरे राख्या म्हणून घेतोस रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल त्यांना मी केव्हाही विसरणार नाही असे माऊली सांगतात.