ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 521
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५२१
पाहणें जें कांहीं त्यासी मुळी पाहें । मग सुखी राहें योगीराया ॥१॥ मी तूं द्वैत भ्रांती पहा रे काढुनी । आत्मा तो गिवसुनी राहे सुखें ॥२॥ अविद्या नाथिली रज्जु सर्पापरी । भासली विचारी अनुभवें ॥३॥ तेंव्हा हे उपाधि राहिली सौरस । ज्ञानदेवदास पूर्ण धाला ॥४॥
अर्थ:-
जगांतील दृश्य पदार्थांना अधिष्ठानरूपाने असणाऱ्या मूळच्या आत्मवस्तुकडे तुला पाहिले पाहिजे. अशारितीने दृश्यपदार्था वरील दृष्टि जाऊन अधिष्ठानाकडे तुझी दृष्टी आली म्हणजे मग योगीराजा तूं सुखाने खुशाल काळ घालव. आत्मज्ञान प्राप्त करून मी व तूं हे द्वैत काढून सुखाने राहा. ज्याप्रमाणे भ्रांतीने दोरीवर सर्पाचा भास होतो. त्याप्रमाणे जिला अस्तित्वच नाही अशी अविद्या आत्म्यावर भासली असे अनुभवाने समजावून घे. असे आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर देहरूप उपाधिची आसक्ती नाहीशी होते व जीव ब्रह्माचे पूर्ण ऐक्य होऊन तृप्ती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.