ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 899
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९९
यातिकुळ माझें गेलें हारपोनी । श्रीरंगावांचुनी आनु नेणे ॥१॥ किती वो शिकवाल मज वेळोवेळां । मी तंव गोवळा रातलिये ॥२॥ अष्टभोग भोगितां मातें नाहीं चाड । भक्तिप्रेम गोड लेइलें गे माये ॥३॥ बापरखुमादेविवरु जीवींचा जिव्हाळा । कांहीं केलिया वेगळा नव्हे गे माये ॥४॥
अर्थ:-
श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात, कुळ सर्व हरपून गेले. आतां श्रीकृष्ण परमात्म्यावाचून दुसरे काही जाणत नाही. संभावित स्त्रीयानी परपुरूषाच्या ठिकाणी प्रेम ठेवू नये. ह्या बुद्धिने तुम्ही मला पुष्कळ व वारंवार उपदेश करता परंतु त्याचा काय उपयोग? मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन गेले आहे. स्त्रीपुरूष भोगांमध्ये दर्शन स्पर्शनादि अष्टभोग आहेत.त्याची आतां मला चाड नाही.कारण श्रीकृष्ण परमात्म्याच्या अत्यंत प्रेमभक्तीचे गोड़ लेणे मी आपल्या अंगावर धारण केले आहे. त्यामुळे अष्टभोगाची मला काय चाड आहे. माझ्या जीवाचा जिव्हाळा असलेले माझे पिता व रखुमाईचा पति जे श्रीविठ्ठल असे जे माझे बाप ते काही केल्या आतां जीवापासून वेगळा होत नाहीत. असे माऊली सांगतात.