ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.982
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९८२
पैल मेरूच्या शिखरीं । एक योगी निराकारी । मुद्रा लावुनी खेंचरी । प्राणायामी बैसला ॥१॥ तेणें सांडियेली माया । त्यजियेली कंथा काया । मन गेलें विलया । ब्रह्मानंदा माझारी ॥२॥ अनुहत ध्वनि नाद । तो पावला परमपद । उन्मनीं तुर्याविनोदें । छंदें छंदें डोलतुसे ॥३॥ ज्ञान गोदावरीच्या तीरीं । स्नान केलें पंचाळेश्वरीं । ज्ञानदेवाच्या अंतरीं । दत्तात्रेय योगिया ॥४॥
अर्थ:-
माऊली या अभंगातून दत्तात्रेयाचे वर्णन करीत आहेत. ‘पैलमेरूच्या शिखरी, म्हणजे जागृतादिअवस्थेच्या पलीकडे असणारी जी तुर्याअवस्था त्या अवस्थेत कोणी एक अधिकार संपन्न योगीपुरूष परमात्मप्राप्ती करिता खेचरी मुद्रा लावून श्रेष्ठ पदावर प्राणायाम करीत बसला आहे. त्याने मायेचा परित्याग तर केलाच आणखी कंथा व ती घालण्याचे शरीर या दोन्हींचा अभिमान सोडला कारण परमानंदामध्ये मन लीन होऊन गेले.अजपा जपाच्या अनुहत ध्वनीचा नाद ही परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झाला. उन्मनी जी तुर्या तिच्या आनंदात डुलत आहे. ज्ञानगंगेत ज्याने पांचाळेश्वरांत स्नान केले आहे. असा दत्तात्रय योगीराज माझ्या अंतरांत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.