ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.975
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
अभंग ९७५
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७५
देहा लाजिलिये शब्दा रूसलिये । कांसवींचें दूध देऊनियां बुझाविलें गे माय ॥१॥ काय सांगों तिचा नवलावो । महालोभेंवीण कैसा येतो पान्हा वो ॥२॥ आवसेचे चांदिणे सांगों गेलिये । रखुमादेविवरा विठ्ठलीं वरपडी जालिये ॥३॥
अर्थ:-
जीव हा मूळचा ब्रह्मस्वरूप आहेच त्याच्या ठिकाणी दुःख कालत्रयहि नाही. परंतु भ्रमामुळे तो दुःख भोगत असतो. त्याला सद्गुरूंनी आत्मज्ञान देऊन भ्रमाची निवृत्ति केली व परमानंदाचा लाभ करून दिला. हाच प्रकार माऊली उदाहरण देऊन सांगतात. मुमुक्षुला सद्गुरू माऊलींनी ब्रह्मविद्या दिली. त्यामुळे मुमुक्षुला देहा लाजिलिये, म्हणजे मी देह म्हणण्यास लाज वाटली. (कारण आजपर्यंत मी देहरूप नसताना देखील मी देह आहे असे म्हणत होतो) त्या मुमुक्षुच्या स्वरूपाचे ठिकाणी शब्द रूसला म्हणजे प्रवृत्त होत नाही. ही सद्गुरूची कृति कशी आहे म्हणाल तर कासवी आपल्या पिलास चाक्षुषकृपेने पोसते. त्याप्रमाणे ‘जयाचेनि कृपा सावाये, किंवा ‘कटाक्षकिरणाश्चांन्त, सद्गुरू माऊलीने कृपाकटाक्षाने कृतार्थ
केले. त्या माऊलीचे काय आश्चर्य सांगावे? ती निर्मोह असून तिला कसा पान्हा येतो. त्यामुळे मुमुक्षुला अज्ञानांधःकारातील ब्रह्मस्वरूपतारूपी चांदणे स्पष्ट सांगितले. त्यामुळे मुमुक्षु परमात्मरूप झाला. असे रखुमादेवीचे पती जे विठ्ठल वरपडी जालिये या चरणाने असे माऊली सांगतात.