ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.915
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९१५
विचारितां देहीं अविचार अंबुला । न साहे वो साहिला काय करूं ॥१॥ सखी सांगे गोष्टी चाल कृष्णभेटी । आम्ही तुम्ही शेवटी वैकुंठी नांदो ॥२॥ येरी सांगे भावो जावे वो प्रवृत्ती । तंव वरी गती येता नये ॥३॥ ज्ञानदेवो प्रवृत्ति निघालिया तत्परा । हरि आला सत्वरा तया भेटी ॥४॥
अर्थ:-
वास्तविक विचार करु गेले तर या देहांत अविचारच शिरजोर झाला आहे. मला तो सहन होत नाही. पण काय करु तेही समजत नाही. तिला तिची मैत्रिण सांगत आहे की आपण दोघी त्या श्रीकृष्णाच्या भेटीला जाऊ. त्याची भेट झाली म्हणजे आपण दोघी आनंदात वैकुंठी नांदू. ती उत्तर सांगते तूं त्या श्रीकृष्णाकडे शुद्ध भावाने जा. अनधिकारामुळे मला श्रीकृष्णाच्या भेटीस येवत नाही. त्या श्रीकृष्णाकडे माझी प्रवृत्ति झाल्याबरोबर तो श्रीहरि तात्काळ माझ्या हृदयांत आला. व मी तत्परच होऊन गेलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.