ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.906

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९०६

भेटिसी गेलिये तंव तेचि जालिये । भुललि ठेलिये मज न कळे कांहीं । परतलिये दृष्टी जंव मागुता न्याहाळी । तंव काळी ना सांवळी मूर्ति चोजवेना ॥१॥ काय सांगो माय न कळे तयाची सोये । येणे मनाचे मोडुनि पाये वेधियेलें ॥२॥ आंतु बाहेरी कैसी भरलेनि रंगें । क्षेम देऊ गेले अंगें तंव तो जडूनि ठेला । वारितां नावरे काय सांगो माय गोठी । करूनि ठेला साठी जीवित्वेंसी ॥३॥ आशेचिये हावे तंव तो परताची धांवे । निराशेसी पावे वेळु न लागतां । बापरखुमादेविवरू विठ्ठली उपावो । ज्ञानदेवा भावो निवृत्तिपायीं ॥४॥

अर्थ:-

त्या श्रीकृष्णाच्या भेटीला मी गेले पण आश्चर्य असे की त्याची भेटी झाल्याबरोबर मी तद्रूपच होऊन गेले. काय झाले हे माझे मलाच कळेना पुन्हा माघारी दृष्टि येऊन न्याहाळून पहावयाला लागले तो, ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ति काळी की सांवळी हे समजेना. त्या श्रीकृष्णाची काय स्वरूपस्थिती आहे. ते काही कळत नाही. या श्रीकृष्णाने माझ्या मनाचे संकल्प विकल्पाची धांव मोडून मला वेड लावून टाकला. अंतरबाह्य त्याचे रंगात भरून गेले. आलिंगन द्यावयास गेले. तो माझ्या जीवासी तो ऐक्य होऊन गेला. काय चमत्कार सांगावा त्याला पलीकडे करावयाला गेले तो माझ्या जिवांहून निराळा होतच नाही. मनांमध्ये वैषनयीक आशा ठेवून त्याला पाहू जावे तर तो उलटा दूर जातो. आणि ज्याचे चित्त निराश म्हणजे निर्विषय झाले असेल त्याला एका क्षणाचा वेळ न लागता तो प्राप्त होतो,माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे श्रीगुरू निवृत्तीरायांच्या चरणी निस्सीमभाव असावा हेच होय, असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *