ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.785

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८५

सत्राविये कोठडिये माजीं निक्षेपिलें । एकी केले धन तें बाविसें नेलें पातेजोनी ॥१॥ आपण नेणतां ऋण घ्यावयासी गेलों । तंव तंव सर्वस्वेसी बुडालों परोपरी देखा ॥२॥ मंत्र सांगितला माझ्या कानीं । जाणोनी ज्ञानविज्ञानी वेडावलों ॥३॥ ऐसें रखुमादेविवरा विठ्ठलाच्या बोला । पातेजलों सर्वस्वासी ठेलों परांङमुख ॥४॥

अर्थ:-|
सत्रावी जीवनकला हीच कोणी एक कोठडी तिच्यामध्ये माझे आत्मस्वरूपी धन ठेवले होते. ते माझे धन पंचमहाभूते पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रिये, मन, आणि बुद्धि या बावीस जणांनी मिळून विश्वासाने चोरून नेले. ते आज पुन्हा माझ्या मुख्यधनासी एक केले. वस्तुतः आपण जाणून नेणतेपणाने ऋण देण्याकरिता परमात्म्याकडे गेलो तोच सर्वप्रकाराने सर्वस्वी बुडालो. म्हणजे परमात्मरूप झालो. याचे कारण श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझ्या कानांत परमात्म ऐक्याचा मंत्र सांगितला. तो यथार्थ जाणून विज्ञान रूप जो परमात्मा त्याच्या स्वरूपात मी वेडावून गेलो.म्हणजे मी परमात्मरूप झालो. अशा प्रकारे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवला इतक्यांत सर्वस्वाशी म्हणजे देहात्म भावावादी प्रपंचाशी पराङ्मुख झालो असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *