ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.749
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४९
प्राण जाये प्रेत न बोले चित्रींचे लेप न हाले । तैसे दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी वो करी हे शब्दची वाउगे ठेले रया ॥१॥ आतां आपणिया आपण विचारी । शेखी प्रकृति ना पुरूष निर्धारी ॥२॥ आतां प्रेताचे अळंकार सोहळे । कां शब्दज्ञाने जे डौरले । दीपने देखती काही केलें । ऐसें जाणोनियां शीण न मनी । ती प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥३॥ बापरखुमादेविवरूविठ्ठल देखतांचि जे बोधले । ते तेणें सुखें होऊनी सर्वात्मक जे असतांची देहीं विस्तारलें । येणे निवृत्तिरायें खुणा दाउनी सकळ । बोलतां शीणु झणे होईल रया ॥४॥
अर्थ:-
प्राण गेलेले प्रेत बोलत नाही भितीवरील चित्र हलत नाही. त्याप्रमाणेपरमात्मस्वरूपाच्या ठिकाणी दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी आहे. असे म्हणणे खोटे आहे असे समज. याकरता तूं आपल्या स्वरूपाविषयी विचार कर. विचार केला म्हणजे शेवटी प्रकृति पुरूषादि भाव आत्म्याचे नाहीत असा तुझा निर्धार होईल. अशी स्थिती झाली असता प्रपंच्याविषयी कौतुक करणाऱ्या लोकांकडे पाहिले म्हणजे त्यांचे शब्दजाळ प्रेतावर घातलेल्या अलंकाराच्या सोहळ्यासारखे त्यांना दिसतात त्याचप्रमाणे शब्दज्ञानाने जे जें कांही प्रकाशित केले ते सर्व फुकट असे न समजता व्यवहारांत कष्ट व प्रतिष्ठा भोगून अन्यता मानतात काय चमत्कार पहा. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनाल तत्वतः जाणून जे बोधवान झाले तेच सुखी झाले व या देहांत असतानाच सर्वरूप झाले ह्या खुणा मला निवृत्तिरायांनी दाखविल्या हे म्हणणे देखील निवृत्तिरायांना कष्टकर होईल असे माऊली सांगतात.