ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.710
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१०
अखंड हरि वाचेसी । जरी सुकृताची राशी । तरीच हरि ये मुखासी । धन्य जन्मासी तो आला ॥१॥ देखतां ज्याचे चरण । यम जातसे शरण । ऐसें सुकृताचें वर्णन । कवणे करावें तयाचें ॥२॥ तोचि एक साधु देखा । नित्य पुसावें त्या विवेका । तो कांहीं न धरी शंका । हरिनाम म्हणतसे ॥३॥ ज्ञानदेवीं निजसूत्र तोचि । धन्य शुद्ध पवित्र । हरिवांचूनि त्याचें वका । नेणें आणिक दुसरें ॥४॥
अर्थ:-
जर अनंत जन्माच्या पुण्याईच्या राशी असतील तरच श्रीहरिचे नाम मुखावाटे येईल. असे नामस्मरण करणाऱ्या पुरूषाचा जन्मही धन्य आहे. त्याचे चरणाचे दर्शन झाले तर साक्षात् यमसुद्धा त्याला लोटंगण घालतो.ज्या पूर्व जन्मार्जित सत्कर्माचे एवढे फल आहे. त्याचे वर्णन कोणी करावे ते धन्य आहेत. आत्मज्ञान संपन्न जे असतील ते खरे साधु आहेत. त्यांना शरण जाऊन आत्मानात्म विवेक विचारावा ते हरिनामस्मरण करणारे, संत आहेत किंवा नाहीत अशी शंका मनांत धरू नये. आत्मकल्याणाची सूत्र म्हणजे मार्ग तोच पवित्र पुरूष जाणत असून त्याची वाणी हरिनाम उच्चारावाचून दुसरे काही जाणत नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.