ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.704
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-५ वे, गुरुवर्णन अभंग ७०४
नित्य धर्म नामपाठ । तेचि वैकुंठींची वाट । गुरूभजनी जो विनट । तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥ धन्य धन्य त्याचा वंश । धन्य तो आला जन्मास । तयाजवळी हृषीकेश । सर्वकाळ नांदतु असे ॥२॥ रामकृष्णस्मरण जप । तेंची तयाचें अमूप तप । तो वास करील कोटी कल्प । वैकुंठपीठ नगरीशी ॥३॥ ज्ञानदेवीं जप केला । हरि समाधीसी साधिला । हरिमंत्रे प्रोक्षिला । सर्व संसार निर्धारें ॥४॥
अर्थ:-
नित्य नेमाने जो नामस्मरण करतो त्याला वैकुंठप्राप्ती होते. कारण नामस्मरण ही वैकुंठाला जाण्याची वाट आहे. जो सद्गुरूंची सेवा करतो त्यास हरिभक्त म्हणतात. ज्याच्या मुखांत नेहमी हरिनाम आहे.तो स्वतः जन्मास येऊन धन्य झाला आहे तसेच त्याचे कुळही धन्य होय कारण त्याचे जवळ हषिकेश सतत नांदत असतो. रामकृष्ण नामाचा जप करणे हेच मोठे तप होय तो वैकुंठभुवनांत कोटी कल्प राहिल. मी या हरिनाम स्मरणाच्या जपाने समाधी साध्य केली. तसेच हरिमंत्राचे संसारावर प्रोक्षण करून अशुद्ध जो संसार तो शुद्ध करून टाकला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.