ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.683
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८३
चातकेंवीण लक्ष अंतरीच ठसलें । तेथें एक वोळलें ब्रह्ममेघ ॥१॥ तें जीव अमृत जीवास जालें । त्याहुनी एक आगळे गे माय ॥२॥ रखुमादेविवरू हातेंवीण स्पर्शलें । चक्षुवीण देखिलें निजब्रह्म गे माये ॥३॥
अर्थ:-
चातकपक्षी पाणी मिळण्याकरता मेघाकडे लक्ष देतो. हे सर्वांना माहित आहे. त्याप्रमाणे माझे लक्ष अंतर्यामी आत्मस्वरूपाकडे लागले आहे तेंव्हा तेथे ब्रह्मरूपी मेघ आनंद अमृताचा वर्षाव करणारा असा पाहीला. तेव्हा त्याच्यापासून जीवाचे जीवन जी परमात्मवस्तु ती जीवास प्राप्त झाली. आतां त्याहून श्रेष्ठ दुसरे कोण आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच ब्रह्म त्याला मी हातावांचून स्पर्श केला. व डोळ्यांवाचून पाहिले असे आत्मरूप ब्रह्म पाहिले. असे माऊली सांगतात.