ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.611
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६११
मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरुप तत्त्व देखिलें गे माय ॥१॥ द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं । विश्वरूपें मिठी देतु हरि ॥२॥ छाया माया काया हरिरुपी ठाया । चिंतिता विलया एक तेजी ॥३॥ ज्ञानदेवा पाहा ओहं सोहं भावा । हरिरुपी दुहावा सर्वकाळ ॥४॥
अर्थ:-
हे सखे, माझी स्थिती काय सांगू. एकरूप म्हणजे जीवब्रह्मैक्य तत्त्व पाहिल्यामुळे मी माझ्या स्वरूपाला म्हणजे परमात्मस्वरूपाला मोहित होऊन निवांत झाले. द्वैताच्या सर्व गोष्टी नाहीशा होऊन शेवटी विश्वरुपालाही मिठी देऊन म्हणजे विश्वरुप नाहीसे होऊन हरिरुपच शिल्लक राहिले. आभास, माया व शरीर यांचे स्वरुप पाहू गेले असतां ती सर्व एकरूप श्रीहरिचे ठिकाणी लय पावली. अहं सोहं भावरुपी जो श्रीहरि, त्याच्या ठिकाणी सर्व काळ आनंदानुभव आहे हे प्रत्यक्ष पाहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.