ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.984
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९८४
पर्वतु गोफणिये सोकरू लेकरूं । ज्याचेनि तृष्णें आटले सप्तहि सागरू । ज्याचेनि स्वेदें बुडाला मेरू । तयामाजीं ने तया मी काय करूं ॥१॥ कैसें नवल चोज जालें गे माय । खांदी गंगा चोरू पळतु आहे ॥२॥ जयाचिया अंगावरी वडाची झाडें । तो हा मुकुटावरी बैसला कोडें । विवळा दृष्टि पाहे निवाडें । घ्या घ्या म्हणोनी ठाकितो पुढें ॥३॥ मनगणिचे तंती वोविली धरणी । ते पिसाळ्याने घेतली खांदा वाहुनी । त्यासी वोवाळिती चौघीजणी बापरखुमादेविवराची करणी ॥४॥
अर्थ:-
गोफणीत दगड घालून शेतकरी जसा पेरलेल्या शेतांचे रक्षण करतो. त्या प्रमाणे हो माया आपल्या जगतरूपी बालकाचे अनेक त-हेने रक्षण करते त्या मायेचे अनेक चमत्कार आहेत. अगस्ती ऋषि हे त्या मायेचे एक पोर आहे. त्या लेकराने सातही समुद्र गिळून टाकले. ज्या ईश्वराच्या इच्छेने प्रलयकाळाच्या उदकाने मेरू पर्वतही बुडवून टाकला अशा ईश्वर स्वरूपांच्या ठिकाणी माझे प्रारब्ध घेऊन जात आहे. त्याला मी काय करू? मायेचा चमत्कार असा आहे की ती अनेक गोष्टी अघटित कशा घडवून आणते.त्या अशा को भगिरथाने प्रयल करून स्वर्गातील गंगा खांद्यावर वाहून मृत्यूलोकांत आणली. वाल्ह्या कोळ्याच्या अंगावर एवढे मोठे वारूळ वाढले की त्या वारुळावर मोठमोठी वडाची झाडे देखील होती. तो बाल्ह्या कोळी नामस्मरणांच्या योगाने ऋषिपदाला प्राप्त होऊन रामभक्त झाला. आपल्या श्रेष्ठ भक्तांना भगवान मस्तकावर धारण करतो. तयाते माथा मी मुकुट करों, या त्याच्या सांगण्याप्रमाणे वाल्ह्या कोळी रामचंद्र प्रभूच्या मुकुटांवर बसून हे रामतत्व तुम्ही जाणुन घ्या. मन कल्पित पृथ्वी म्हणजे अज्ञान आपल्या खांद्यावर घेऊन जीव वेड्या सारखे हिंडतात. असा जो माया पती ईश्वर त्याची चार वेद ओवाळणी करतात. माझे पिता व रखमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांच्या मायेची करणी आहे असे माऊली सांगतात.