ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.966
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
अभंग ९६६
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके वासुदेव अभंग ९६६
घुळघुळा वाजती टाळ । झणझणां नाद रसाळ । उदो जाली जाहाली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ ॥१॥ कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळापोटीं माय रिघेल । मेले माणूस जीत उठवील । वेळ काळांतें ग्रासील ॥२॥ आतां ऐसेंची अवघे जन । येतें जातें तयापासून । जगी जग झालें जनार्दन । उदो प्रगटलें बिंबले भान ॥३॥ टाळटाळी लोपला नाद । अंगोअंगी मुराला छंद । भोग भोगितांचि आटला भोग । ज्ञान गिळूनि गावा गोविंद ॥४॥ गांवा आंत बाहेरी हिंडे आळी । देवो देविची केली चिपळी । चरण नसतां वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांति सांवळी ॥५॥
अर्थ:-
हे जग ज्यांच्यापासून होते तो जनार्दनच आतां सर्व जगतांमध्ये प्रगट होऊन त्यांचे भान सर्व लोकांत झाले आहे. ज्या आनंदांत टाळ किंवा टाळ्यांच्या नाद लुप्त होऊन ज्या छंदाने वासुदेवाचे भजन होते,तो छंदहि मुरुन भोग भोगीत असतांहि भोगाची आटणी होऊन झालेल्या वासुदेवाच्या ज्ञानाचाही लय होऊन वैष्णवांचे, गोविंदाचे गाणे चालले आहे. असे भजन करावे आतां असा भजन करणारा पुरुष गावाच्या आळीत हिंडत असताहि तो त्याच्या बाहेर आहे. त्याच्या चिपळ्या म्हणजे प्रकृति पुरुषाच्या आहेत. वस्तुतः त्या भगवत् भक्ताला चरण नसतांहि नाचण्यांचा आवाज घुमत आहे. असे भजन करित असता शामसुंदर वर्णाचा जो भगवान श्रीकृष्ण त्यांचीच कांति माझे अंगावर उमटली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.