ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.961
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
अभंग ९६१
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके पांगुळ अभंग ९६१
मृत्यलोका माझारी गा एक सद्गुरू साचारू । त्याचेनि गा दर्शनें तुटला हा संसारू । पांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदारू । यालागीं नांव त्याचे वेदा न कळे पारू ॥१॥ धर्माचें वस्ति घर ठाकियलें बा आम्हीं । दान मागों ब्रह्म साचें नेघों द्वैत या उर्मी ॥२॥ विश्रांती विजन आम्हां एक सद्गुरू दाता । सेवितां चरण त्याचे फिटली इंद्रियांची व्यथा । निमाली कल्पना आशा इळा परिसी झगटतां । कैवल्य देह जालें उपरती देह अवस्था ॥३॥ मन हें निमग्न जालें चरणस्पर्श तत्त्वतां । ब्रह्माहंस्फूर्ति आधी भावो उमटला उलथा । पांगुळलें गुह्यज्ञान ब्रह्मरूपें तेथें कथा । अंध मग दृढ जालों निमाल्या विषयाच्या वार्ता ॥४॥ ऋद्धिसिद्धि दास्य सख्य आपेआप वोळलीं । दान मान मंद बुद्धि ब्रह्मरूपें लींन झालीं । वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगळा जीवनमार्गु सतरावी हे वोळली ॥५॥ पांगुळ मी कल्पनेचा पंगु जालों पैं मनें । वृत्ति हे हरपली एका सद्गुरूरूप ध्यानें । निवृत्तीसी कृपा आली शरण गेलों ध्येयध्याने ॥६॥
अर्थ:-
या मृत्युलोकामध्ये एक सद्गुरूच सत्य आहे. त्याच्या दर्शनाने माझा संसारबंध तुटून गेला असा तो सद्गुरू उदार दयाळू दाता आहे. तो पांगळ्यांना म्हणजे कोणतेही परमार्थसाधन करण्याला असमर्थ असलेल्यांना हात पाय देतो म्हणजेच परमार्थ साधनाला साह्य करतो, असा सद्गुरूंचा महिमा आहे. त्याचा महिमा वेदांनाही कळत नाही.धर्माच्या वस्तीचे घर असा जो श्रीगुरू त्याची आम्ही प्राप्ती करून घेऊन ब्रह्मरसाचे दान मागतो. द्वैत विचाराच्या वासना मुळीच स्वीकारीत नाही.यामुळे आम्हाला आकाशात श्रीगुरूचरणाची उपासना करण्यांतच होणारी इंद्रियांची पिडा कल्पनेसह वर्तमानात नष्ट झाली. ज्याप्रमाणे परिसाला लोखंडी विळ्याचा स्पर्श झाला असतांना त्या लोखंडाचे स्वरूप पालटून तो सुवर्णरूप होतो. त्याप्रमाणे अत्यंत अमंगळ असा आमचा देह असतांना सद्गुरूंच्या चरणस्पर्शाने संसारापासून उपरति होऊन देह कैवल्यरूप झाला. सद्गुरू चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर देहाभिमान धरणारे मन त्या श्रीगुरूचरणांत म्हणजे ब्रह्मस्वरूपांत निमग्न होऊन गेले. देहभावाचा उलथा म्हणजे विरूद्ध ब्रह्मभावाची स्फुरती उमटली ह्या गुह्य अशा ब्रह्मज्ञानाच्या कथा सुरु होऊन विषयाच्या वार्ताही मावळून गेल्या याप्रमाणे मी पांगळ्याचा धड धाकट झालो. यांत काय नवल आहे? रिद्धिसिद्धि आमच्या दासी होऊन राहिल्या, दास्य सख्यांदिक भक्ति आमच्या कडे घर चालत आली. यत्किचित् दातृत्वाचा अभिमान किवां शरीराविषयी अहंभाव असणारी जी क्षुद्रबुद्धी होती ती ब्रह्मस्वरुपांत विलीन झाली. श्रीगुरु कामधेनू प्राप्त झाल्यामुळे आमचा पांगुळपणा वाळून गेला. आणि जीवनाचा मार्ग जी सतरावी आत्मकला ती प्राप्त झाली. वस्तुतः व्यवहारदृष्टया मी हातापायांनी धड असतांना केवळ मनाच्या कल्पनेने मी पांगळा झालो होतो. परंतु सद्गुरुच्या ध्यानाने ती वृत्ति मावळून गेली.श्रीगुरु निवृत्तिरायांना माझेविषयी दया आली ध्येय ध्यानादि सर्व प्रकार श्रीगुरुच आहेत. अशाबुद्धिने शरण गेलो म्हणून माझे पांगळेपणा नाहीसा होऊन श्रीगुरुच्या कृपेने मी कृत्यकृत्य झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.