ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.959

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९५९

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके आंधळा अभंग ९५९

पूर्वजन्मी पाप केलें तें हैं बहु विस्तारलें । विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदलें । चौऱ्यांशी लक्ष योनी फिरतां दुःख भोगिलें । ज्ञानदृष्टि हारपली दोन्ही नेत्र आंधळे ॥१॥ धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दष्टि देतो त्याचे नाम मी उच्चारी ॥२॥ संसार दुःखमूळ चहूंकडे इंगळ । विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ । कामक्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ । कवणा मी शरण जाऊं आतां दृष्टि देईल निर्मळ ॥३॥ मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणीं । इष्ट मित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी । एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी । तेथें कोणी सोडविना एका सदगुरुवांचुनी ॥४॥ साधुसंत मायबाप तिही केलें कृपादान । पंढरिये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्नान । पुंडलिके वैद्यराजे पूर्वी साधिलें साधन । वैकुंठीचें मूळपीठ डोळां घातलें तें अंजनं ॥५॥ कृष्णांजन एकवेळां डोळां घालितां अढळ । तिमिर दुःख गेलें फिटलें भ्रांतीपडळ । श्रीगुरु निवृत्तिरायें मार्ग दाविला सोज्वळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठल दिनाचा दयाळ ॥६॥

अर्थ:-
मी मागच्या जन्मामध्ये पापाचरण केले, त्यामुळे हा जन्ममरणाचा विस्तार झाला जन्माला आल्यानंतर नाशिवंत विषय सुख भोगण्यामुळे ते पाप अधिकच वाढत गेले. त्यामुळे अंधकाराने डोळे कोंदुन गेले. व चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरता फिरता दुःख भोगावे लागले. आणि आत्मज्ञानाची दृष्टि नसल्यामुळे दोन्ही नेत्र आंधळ्या सारखे झाले. परमभाग्यवान जे निवृत्तिराय ते अत्यंत परोपकारी असून आत्मज्ञानशून्य पुरुषाला आत्मज्ञान दृष्टि देणारे आहे. म्हणून मी त्यांच्या नावांचा वारंवार जप करतो. त्यांच्या ठिकाणी सहज असलेला आत्मज्ञानाचा धर्म माझे ठिकाणी जागृत होवो. संसार हा दुःखमूळ असून त्रिविध तापाचे इंगळ त्यांच्या भोवती पसरले आहे. त्यामुळे जीवांना क्षणमात्र कोठेही विश्रांती नसल्यामुळे रात्रंदिवस तळमळ लागलेली असते काम क्रोध लोभरुपी ओढाळ कुत्री पाठीस लागलेली असल्यामुळे अशा स्थितीतून सुटण्यांकरिता मी कुणाला शरण जाऊ? कि ज्यामुळे ते मला आत्मस्वरुपाविषयी निर्मळ दृष्टि देतील. वास्तविक विचार केला तर आई बाप बहिणी हे अंतःकाळाच्या वेळेला उपयोगी पडत नाही. इष्ट मित्र सोयरे धायरे हे आपले येथे जोपर्यंतच आपला सुखाचा व्यवहार चाललेला आहे. तोपर्यंतच जमतात मी मात्र संसारिक दुःख( जन्ममरणाचे दुःख) एकटाच भोगीत असून कुंभपाकादि नरकाच्या जाचणीत मला एकट्याला दुःख भोगावे लागते. त्या दुःखातून सोडवणारा जर कोणी असेल तर ते एक श्रीगुरुच आहेत. माझे भाग्य धन्य आहे. कारण मायबाप जे साधुसंत त्यांनी मला कृपादान करुन पंढरीच्या यात्रेला नेले त्याठिकाणी चंद्रभागेचे स्नान घडले. पुंडलिक वैद्याने अज्ञानरुपी अंधत्व जाण्याकरिता पूर्वीचे औषध तयार करुन ठेवले होते. ते वैकुंठीचे मूळपीठ भगवान पांडुरंगरुपी अंजन मी डोळ्यांत घातले. ते कृष्णांजनरुपी अंजन मी डोळ्यांत घातल्याबरोबर अज्ञानरुपी दुःखबीज जाऊन संसारभ्रांतीच्या पडळातून मुक्त झालो. दीनजनांचा दयाळू असलेले माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांच्या प्राप्तीचा सोज्वळ मार्गश्रीगुरुनिवृत्तिरांयांनी मला दाखविला. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *